टी२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित कला गेला आहे. दोन्ही देश कट्टर विरोधी असल्यामुळे चाहत्यांमध्ये या सामन्याविषयीची उत्सुकता शिगेला गेली आहे. अशात रविवारच्या सामन्यात कोणता संघ जिंकतो याविषयी अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या यादीत आता पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इमरान खान यांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे आणि पाकिस्तानला या सामन्यात विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी इमरान खान यांनी जियो टीव्हीशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सध्याच्या पाकिस्तान संघात भारताला हरवण्याची प्रतिभा असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, “इंशाल्लाह, पाकिस्तान उद्या भारताला नक्कीच हरवेल. इमानदारीने सांगायचे तर, जे घडले ते आपल्या पलिकडे आहे. आम्ही सामन्याच्या दिवशी आमची क्षमता आणि आत्मविश्वासाचा वापर करू इच्छित आहोत, जेणेकरून आम्हाला चांगले परिणाम मिळतील. रेकॉर्ड तोडले जाण्यासाठीच असतात.”
अशातच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने म्हटले की, भारत-पाकिस्तान संघर्ष खेळाडूंना दबावात टाकतो. बाबर यावेळी म्हणाला की, “पाकिस्तान आणि भारतामधील सामना नेहमी तीव्र भावनेने भरलेले असतात, त्यामुळे आम्हाला खेळाच्या तिनही विभागांमध्ये चांगले प्रदर्शन करण्याची गरज आहे.” दरम्यान, दोन्ही संघांकडे यूएईमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आहे. पाकिस्तान संघ त्यांचे आंतरराष्ट्रीय सामने गेल्या काही वर्षांत यूएईत खेळतो, तर भारतीय खेळाडूंनाही आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात यूएईमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव आला आहे.
भारत आणि पाकिस्तान संघ आतापर्यंत एकूण १२ वेळा टी२० आणि वनडे विश्वचषकात आमने सामने आले आहेत आणि यामध्ये पाकिस्तानला एकदाही विजय मिळवला आलेला नाही. या १२ सामन्यांपैकी पाच सामने टी-२० विश्वचषखातील, तर सात सामने एकदिवसीय विश्वचषकातील आहेत.
भारतीय संघाने टी२० विश्वचषकातील त्यांच्या दोन सराव सामन्यांमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांना धुळ चारली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान संघाने सराव सामन्यांपैकी वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मांडल्या ‘या’ चार महत्त्वाच्या गोष्टी