कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात कोलकातामधील ईडन गार्डन्सनवर ३ सामन्यांची टी२० मालिका पार पडली. या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने १७ धावांनी विजय मिळवला आणि वेस्ट इंडिजला ३-० अशा फरकाने मालिकेत पराभूत केले. या विजयाबरोबरच रोहित शर्मा याच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिका विजयानंतर आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल क्रमांकावर विराजमान झाला आहे.
तब्बल ६ वर्षांनी भारतीय संघ अव्वल स्थानी
भारतीय संघाने आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल स्थान तब्बल ६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिळवले आहे. यापूर्वी भारताने एमएस धोनी याच्या (MS Dhoni) नेतृत्त्वाखाली असा कारनामा केला होता. त्यावेळी धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ १२ फेब्रुवारी ते ३ मे २०१६ या दरम्यान टी२० क्रमवारीत अव्वल स्थानी होता. त्यानंतर आता ६ वर्षांनी रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने टी२० क्रमवारीत पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळवला आहे.
त्याचमुळे भारताला आयसीसी टी२० क्रमवारील अव्वल स्थान मिळवून देणारा रोहित धोनीनंतरचा दुसराच कर्णधार देखील ठरला आहे (India becomes No.1 team in ICC T20I rankings).
भारताने इंग्लंडला टाकले मागे
भारताने टी२० क्रमवारीत अव्वल स्थान मिळवताना इंग्लंडला मागे टाकले आहे. यापूर्वी इंग्लंड २६९ गुणांसह अव्वल क्रमांकावर होते. मात्र, आता भारताने पहिल्या क्रमांकावर कब्जा केला. यावर्षी भारताने टी२० क्रिकेटमध्ये पराभव स्विकारलेला नाही. वेस्ट इंडिजच्या आधी रोहितच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला टी२० मालिकेत व्हाईटवॉश दिला होता. त्याचाच फायदा भारताला टी२० क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्यासाठी झाला आहे.
कर्णधार रोहितने नावावर केले मोठे विक्रम
भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात मिळवलेला विजय हा रोहित शर्मासाठी कर्णधार म्हणून मायदेशात मिळवलेला १४ वा आंतरराष्ट्रीय टी२० विजय होता. त्यामुळे तो मायदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० विजय मिळवणारा भारतीय कर्णधार बनला आहे. त्याने याबाबतीत विराट कोहली आणि एमएस धोनीला मागे टाकले आहे. विराटने भारतात १३ आणि धोनीने १० विजय कर्णधार म्हणून मिळवले होते. त्याचबरोबर रोहितचा हा कर्णधार म्हणून सलग ९ वा आंतरराष्ट्रीय टी२० विजय देखील ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचं टेंशन वाढलं! प्रमुख गोलंदाज जखमी, श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेला मुकण्याची शक्यता
मुलगा आवेशच्या पदार्पणाविषयी वडिलांना नव्हती कसलीही कल्पना; म्हणाले, ‘खूप दिवसांपासून वाट पाहात…’