भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील सुरुवातीच्या दोन्ही दिवशी भारतीय फलंदाजांचा बोलबाला राहिला आहे. भारतीय संघाला या सामन्यातील पहिल्या डावात ३४५ धावा करण्यात यश आले आहे. तसेच भारतीय संघाकडून पदार्पण करत असलेल्या श्रेयस अय्यरने तुफानी शतकी खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या खेळीसह त्याने जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे.
न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरला पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि संधीचे सोने करत त्याने तुफानी शतक झळकावले. हे शतक कानपूरच्या मैदानावर आल्यामुळे त्याच्यासाठी हे शतक आणखी खास झाले आहे. यामागील कारण असे की, ७ वर्षांपूर्वी श्रेयस अय्यर जेव्हा १९ वर्षांचा होता, त्यावेळी याच मैदानावर रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळत असताना त्याला आपले प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्याकडून ओरडा बसला होता.
परंतु यावेळी त्याला न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात अजिंक्य रहाणेने संधी दिली. या संधीचे सोने करत त्याने १७१ चेंडूंमध्ये १३ चौकार आणि २ षटकारांचा मदतीने १०५ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरने या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावल्यानंतर ७ वर्षांपूर्वी कानपूरमध्ये झालेल्या मुंबईच्या रणजी सामन्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
मुंबई संघाला त्यावेळी अडचणीचा सामना करावा लागला होता. कारण पहिल्याच सामन्यात जम्मू काश्मीर संघाने मुंबई संघाला पराभूत केले होते. तर पुढील सामन्यात रेल्वे संघाने देखील मुंबई संघाला पराभूत केले होते. या सामन्यांमध्ये फ्लॉप ठरलेल्या श्रेयस अय्यरच्या संघातील स्थानावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. त्यावेळी त्याचे प्रशिक्षक त्याला संतापात म्हणाले होते की, “इथे बसून काय टाळ्या वाजवतोय, तिकडे जा आणि खेळ. लोकं तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील.”
प्रशिक्षकांकडून ओरडा बसल्यानंतर श्रेयस अय्यरने त्यांना निराश केले नव्हते. ग्रीन पार्कच्या मैदानावर त्याने प्रवीण कुमार आणि अंकित राजपूतसारख्या गोलंदाजांचा निडरपणे सामना केला होता. उत्तर प्रदेश संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २०६ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अवघ्या ५३ धावांवर मुंबईचे ५ फलंदाज माघारी परतले होते. त्यावेळी श्रेयस अय्यरने ७५ धावांची तुफानी खेळी केली होती.
मुख्य बाब म्हणजे श्रेयस अय्यर आपली किट हॉटेलमध्येच विसरला होता. त्यामुळे प्रशिक्षक आणखी चिडले होते. त्यावेळी श्रेयस अय्यरने शार्दुल ठाकूरची किट घालून फलंदाजी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘टी२० विश्वचषकातील सामन्यापूर्वीच पाकिस्तानला घाबरलेले भारतीय खेळाडू’, माजी क्रिकेटर बरळला
कानपूर कसोटीत सपशेल फेल ठरलेल्या मयंकच्या शैलीत आहे ‘या’ गोष्टीची कमी, दिग्गजाने दाखवली उणीव
ऐतिहासिक! १९५७ नंतर अशी कामगिरी करणारा विदेशी गोलंदाज बनला साऊदी