जगातील सर्वात श्रीमंत समजली जाणारी लीग म्हणजे आयपीएल होय. या लीगची सुरुवात २००८ मध्ये झाली. तेव्हापासून आतापर्यंत आयपीएलने यशाचं शिखर गाठलं आहे. आयपीएलमुळे भारतालाच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेट जगताला काही जबरदस्त प्रतिभावान खेळाडू मिळाले आहेत.
भारतीय क्रिकेटला आयपीएलमुळे खूप फायदा झाला आहे. यातून भारताला काही दिग्गज खेळाडू मिळाले आहेत.
आयपीएलबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये कर्णधाराची भूमिका खूप महत्त्वाची असते. जरी आपला संघ ठिक असेल, तरीही एक चांगला कर्णधार आपल्या संघाजवळ असणं गरजेचे असते. आजपर्यंत आयपीएल इतिहासात बरेच दिग्गज कर्णधार होऊन गेले.
रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद आपल्या संघाच्या नावावर केले आहे. त्यामुळे त्याचे नाव सर्वात यशस्वी कर्णधारामध्ये घेतले जाते. त्यानंतर सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीनेही (MS Dhoni) ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद आपल्या संघाच्या नावावर केले आहे.
आयपीएलमध्ये सध्या सर्व संघांकडे चांगले कर्णधार आहेत. यातील काही कर्णधार चांगले प्रदर्शन करत आहेत, तर काही नाहीत. जरी या संघांकडे चांगले कर्णधार आहेत. पण पुढच्या कर्णधाराच्या पर्यायासाठी संघ नक्कीच विचार करत असतील.
आज आपण या लेखात त्या तीन खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांना पुढील काही काळात आपल्या आयपीएल संघाचे नेतृत्व करू शकतात.
ऍरॉन फिंच (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा कर्णधार सध्या विराट कोहली (Virat Kohli) आहे. तो बऱ्याच वेळेपासून आरसीबीचा कर्णधार आहे. पण त्याच्या नेतृत्वाखाली संघाने आजपर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद आपल्या संघाला मिळवून दिलेले नाही. यामुळेच त्याच्या कर्णधार पदावर प्रश्न उपस्थित केले जातात. पण विराट स्वत: म्हणाला आहे, की जोपर्यंत आयपीएल खेळेल, तोपर्यंत आरसीबीकडूनच खेळेल.
यामुळे तो कोणत्याही दुसऱ्या संघाकडून खेळण्याचा विचार करणार नाही. त्यामुळे आरसीबी ही विराटवर जास्त भरोसा ठेवते. अशामध्ये त्याचे कर्णधारपद इतर खेळाडूकडे जाणे खूप कठीण आहे. परंतु जर विराटने कर्णधारपद सोडले, तर ऍरॉन फिंच (Aaron Finch) आरसीबीचा पुढील कर्णधार बनू शकतो. आरसीबीने या मोसमात त्याला आपल्या संघात घेतलं आहे. त्याने आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केलं आहे. तो सध्या ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांंच्या संघाचा कर्णधार आहे.
आंद्रे रसेल (कोलकाता नाईट रायडर्स)
यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) हा सध्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Night Ridars) संघाचा कर्णधार आहे. मागील तीन मोसमापासून त्याने संघाचे नेतृत्व केले आहे. कार्तिकमध्ये नेतृत्व करण्याची चांगली क्षमता आहे. पण आतापर्यंत त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अपेक्षित कामगिरी केली नाही. अशात जर कार्तिकला कर्णधार पदावरून किंवा संघातून काढलं गेलं, तर रसेल (Andre Russell) हा कर्णधार बनू शकतो. रसेल हा संघातील सर्वात महत्वाचा सदस्य आहे. त्याने स्वत: च्या दमदार कामगिरीने संघाला विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळे रसेल केकेआरचा पुढील कर्णधार बनू शकतो.
बेन स्टोक्स (राजस्थान रॉयल्स)
सध्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आहे. त्याला या मोसमात कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. यापूर्वी चेंडू छेडछाडीमुळे त्याला एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे तो आयपीएल खेळू शकला नाही. त्यामुळे अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) राजस्थानचा कर्णधार होता.
रहाणेला २०२० च्या मोसमासाठी झालेल्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आपल्या संघात सामील केले. त्यामुळे राजस्थान संघाचे कर्णधारपद स्मिथकडे सोपविण्यात आले आहे. जर स्मिथ कोणत्या कारणामुळे आयपीएल खेळू शकला नाही, तर बेन स्टोक्स (Ben Stokes) राजस्थान संघाचा कर्णधार बनू शकतो.
वाचनीय लेख-
-डावखुऱ्या भारतीय खेळाडूंची ड्रीम ११; पहा कोण आहे यष्टीरक्षक
-कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारे संघ