पहिलीवहिली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि या स्पर्धेचा अतिशय महत्त्वाचा अंतिम सामना हा 18 ते 22 जूनदरम्यान साउथम्पटन येथे रंगणार आहे. कोट्यावधी क्रिकेटरसिकांच्या नजरा भारत विरुद्ध न्युझीलंड दरम्यान होणाऱ्या या अंतिम सामन्यावर लागून आहेत. दोन्ही संघांचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास खडतर होता. सोबतच कोरोना महामारीमुळे बरेचसे सामनेही रद्द झाल्यामुळे सरासरीच्या आधारावर दोन्ही संघांना अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे.
भारत विरुद्ध न्युझीलंड यांच्यातील द्वंद्व तसे जुनेच आहे आणि जेव्हाही हे संघ समोरासमोर असतील; तेव्हा कोणत्या एका संघाला वरचढ म्हणता येत नाही. त्यामुळे कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना हा अतिशय रोमहर्षक होणार असून दोन्ही संघ आपल्या खेळाडूंसोबत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. तत्पुर्वी आज आपण या लेखात त्या 3 घटनांची माहिती घेऊया, ज्यात भारत विरुद्ध न्युझीलंड कसोटीत सर्वाधिक धावा केल्या गेल्या.
3. 1476 धावा, वेलिंग्टन कसोटी 2014
2014 साली वेलिंग्टनमध्ये भारत आणि न्युझीलंड दरम्यान कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात एकूण 1476 धावा दोन्ही संघांनी केल्या, ज्यात न्युझीलंड संघाने आपल्या दोन्ही डावात अनुक्रमे 192 आणि 680 धावा केल्या होत्या. त्याचवेळी भारतीय संघाने आपल्या दोन्ही डावात अनुक्रमे 438 आणि 166 धावा केल्या होत्या. याच्या परिणामस्वरूप उभय संघांतील हा सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात न्युझीलंडच्या ब्रेंडन मॅकुलमने शानदार त्रिशतक ठोकले होते.
2.1495 धावा, हॅमिल्टन कसोटी 1999
भारत आणि न्युझीलंड दरम्यान हॅमिल्टनच्या मैदानावर शानदार तिसरा कसोटी सामना झाला होता. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी शानदार फलंदाजी करतांना प्रेक्षकांचे पैसावसूल मनोरंजन केले होते. या कसोटीत न्युझीलंडने दोन्ही डावात अनुक्रमे 366 व 464 धावा केल्या, तर भारतीय संघाने अनुक्रमे 416 व 249 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे एकूण 1495 धावा या सामन्यात दोन्ही संघांनी उभ्या केल्या होत्या. दरम्यान फक्त 30 विकेट्सच गोलंदाजांना घेता आल्या होत्या. ही भारत आणि न्युझीलंड दरम्यान झालेल्या कसोटीतील दुसरा सर्वात मोठी धावसंख्या होती. या सामन्यात राहुल द्रविडने दोन्ही डावात शतकीय खेळी केली होती.
1. 1505 धावा, ऑकलंड कसोटी 1990
भारत आणि न्युझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांत सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम या सामन्यात झाला होता. दोन्ही संघाच्या फलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले होते. या सामन्यात एकूण 1505 धावा केल्या गेल्या होत्या. ज्यात न्युझीलंड संघाने आपल्या दोन्ही डावात अनुक्रमे 391 व 483 धावा केल्या होत्या. त्याचवेळी त्याला प्रत्युउत्तर म्हणून भारतीय संघाने अनुक्रमे 482 आणि 149 धावा केल्या होत्या. या सामन्यात भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी पहिल्या डावात 192 धावांची सुरेख खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड नव्हे तर न्यूझीलंड संघ ठरतोय भारतासाठी घातक, १ वेळा हिसकावलाय विश्वचषक
‘ट्रान्सफर विंडो’ची सुविधा असती, तर ‘या’ भारतीयांनी गाजवली असती परदेशी लीगची मैदाने!
वनडे कारकिर्दीची दणक्यात सुरुवात करणारे ३ भारतीय, एकाने पदार्पणात केलंय शतक